ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

वक्‍तृत्व शैलीचा प्रभावीपणे वापर

वक्‍तृत्व शैलीचा प्रभावीपणे वापर कसा कराल?

वक्‍तृत्व शैलीचा प्रभावीपणे वापर कसा कराल?
वक्तृत्वातील यश हे काळजीपूर्वक केलेली पूर्वतयारी आणि त्यानंतर केलेले प्रभावी सादरीकरण या दोन मूलभूत घटकांवर अवलंबून असते. या घटकांतर्गत येणाऱ्या सर्व बाबींचा जरी सामान्य वक्तृत्व असलेल्या व्यक्तीने सूक्ष्म अभ्यास केला, तरी त्याला असामान्य वक्तृत्वशैली विकसित करणे अजिबात अवघड जात नाही. एखाद्या विशिष्ट ठिकाणी भाषण करायचे असताना आयोजकांच्या वक्‍त्याकडून निश्‍चित अपेक्षा काय आहेत, याची जाणीव वक्‍त्याला असणे गरजेचे असते; अन्यथा असा वक्ता आयोजकांना आणि श्रोत्यांना समाधानी करू शकत नाही.

चांगली वक्तृत्वशैली असणे हा उत्तम वैयक्तिक गुण आहे, ज्यामुळे औद्योगिक किंवा शैक्षणिक किंवा सार्वजनिक स्तरांवर सन्मान मिळविणे आणि लोकप्रिय होणे अतिशय सोपे जाते. उत्तम वक्तृत्व जरी दैवी देणगी मानली, तरीदेखील स्वतंत्र आणि परिणामकारक वक्तृत्वशैली केवळ सरावातूनच विकसित करता येते. प्राचार्य शिवाजीराव भोसले, जर्मनीचे माजी पंतप्रधान विनस्टन चर्चिल, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांसारख्या सन्माननीय व्यक्ती त्यांच्या महान कार्याबरोबरच त्यांच्या वक्तृत्वामुळे आजही आपल्याला आठवतात. इतकेच नव्हे, तर काही प्राध्यापकांची काही वाक्‍ये, चित्रपटामधील काही संवाद, प्रथितयश वकिलांनी केलेला युक्तिवाद आजही आपल्याला आठवतात. अशा आठवणी केवळ उत्तम वक्तृत्वामुळेच होत राहतात. वक्तृत्वातील यश हे काळजीपूर्वक केलेली पूर्वतयारी आणि त्यानंतर केलेले प्रभावी सादरीकरण या दोन मूलभूत घटकांवर अवलंबून असते. या घटकांतर्गत येणाऱ्या सर्व बाबींचा जरी सामान्य वक्तृत्व असलेल्या व्यक्तीने सूक्ष्म अभ्यास केला, तरी त्याला असामान्य वक्तृत्वशैली विकसित करणे अजिबात अवघड जात नाही.

एखाद्या विशिष्ट भाषणाची सुरवात करायची ठरल्यावर काही व्यक्ती अनावश्‍यक गंभीर किंवा उदास होतात. वास्तविक पाहता, तसे होण्याची काहीच गरज नाही. भाषणासाठी आवश्‍यक असणारे सर्व साहित्य सहजी उपलब्ध आहे अथवा नाही हे प्रथमतः पाहावे लागते. त्यानंतर परिणामकारक सादरीकरणासाठी आवश्‍यक असणारी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत किंवा नाहीत, हे बघावे लागते. या दोन्ही गोष्टी जर सहजी उपलब्ध होत नसतील, तर त्यांची उपलब्धता कशी सुकर करायची, याचा विचार करावा लागतो. भाषणासाठी आवश्‍यक असणारे सर्व साहित्य आणि सादरीकरणासाठी लागणारी सर्व उपकरणे यांची जमवाजमव झाली की आपोआपच वक्तृत्वाचा आत्मविश्‍वास द्विगुणीत होतो.

याबरोबरच सादरीकरण कशा प्रकारे करायचे याचा प्रत्येक मुद्‌द्‌यागणिक विचार करावा लागतो. एखादा मुद्दा कितीही चांगला असला तरी तो प्रभावीपणे श्रोत्यांना पटवून देता आला नाही, तर वाक्‍याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. याउलट एखाद्या वाईट मुद्‌द्‌याचे परिणामकारक पटवणे लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. अनेक व्याख्याने झाल्यानंतर, अनुभवातून, श्रोत्यांविषयी एखाद्या वक्‍त्याला अचूक अंदाज बांधता येतो, त्यामुळे सर्व मुद्दे यशस्वीपणे पटविणे अतिशय सोपे होते.

अचूक पूर्वतयारी व प्रभावी सादरीकरणासाठी केलेली रंगीत तालीम याकरिता काही वेळा वक्तृत्वाला जास्त वेळ द्यावा लागतो. परंतु, या ठिकाणी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की अशा प्रकारे व्यतीत केलेला वेळ वाया गेला नसून, तो मौल्यवान गुंतवणूकच ठरतो. भाषणाची रंगीत तालीम करीत असताना बऱ्याचशा महत्त्वाच्या बाबी वक्‍त्याला आपोआप किंवा नकळत लक्षात येतात. उदा. कोणत्या शब्दांवर विशेष भर द्यायचा, याबाबतचा योग्य निर्णय, देहबोली परिणामकारक होण्यासाठी कशा प्रकारे शारीरिक हालचाली करायच्या, उपलब्ध उपकरणांचा उपयोग कोणत्या वेळी आणि कशा प्रकारे करायचा, वगैरे. रंगीत तालीम करीत असताना जर एखाद्या मार्गाचा अवलंब अपेक्षित किंवा इच्छित परिणाम साध्य करण्यास मदत करीत नाही असे निदर्शनास आले तर तो मार्ग बदलणे इष्ट ठरते. कोणताही यशस्वी वक्ता कितीही अनुभवी आणि हजरजबाबी असला तरीही तो बिनचूक पूर्वतयारी केल्याशिवाय कधीही व्यासपीठावर जात नाही. कदाचित या तत्त्वांमध्येच त्याच्या यशाचे रहस्य दडलेले असते.

"सार्वजनिक स्तरावर प्रभाव पाडणारे फारच थोडे वक्ते आहेत याचे प्रमुख कारण फारच थोडे वक्ते वैयक्तिक पातळीवर बारकाईने विचार करतात,' असे अमेरिकेमध्ये म्हटले जाते. या विधानामध्ये निश्‍चितच तथ्य आहे. प्रत्येक वक्‍त्याने जर सार्वजनिक स्तरावर पोहोचण्यापूर्वी भाषणाबाबत वैयक्तिक पातळीवर भाषण परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर संभाव्य भाषणामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो. कदाचित, या एकमेव घटकामुळे यशस्वी भाषण होणे सहजी शक्‍य होते.

पूर्वतयारी कशी करावी?
एखाद्या विशिष्ट ठिकाणी भाषण करायचे असताना आयोजकांच्या वक्‍त्याकडून निश्‍चित अपेक्षा काय आहेत, याची जाणीव वक्‍त्याला असणे गरजेचे असते; अन्यथा असा वक्ता आयोजकांना आणि श्रोत्यांना समाधानी करू शकत नाही. यासाठी वक्‍त्याचे मुद्दे आणि श्रोत्यांच्या अपेक्षा यामध्ये तफावत असता कामा नये. याबरोबरच श्रोते कोण आहेत हेसुद्धा वक्‍त्याला माहीत असणे आवश्‍यक असते. श्रोत्यांची बौद्धिक पातळी, आकलन क्षमता, अनुभव या बाबींचे सूक्ष्म विश्‍लेषण होणे महत्त्वाचे असते. या विश्‍लेषणातूनच भाषणातील मुद्दे आणि सादरीकरणाची शैली यांचा उगम होतो. उदा. तरुण वर्गाला जी व्यावहारिक उदाहरणे सामान्यतः आवडतात, तीच उदाहरणे ज्येष्ठ व्यक्तींना किंवा ज्येष्ठ नागरिकांना आवडतीलच असे नाही. श्रोत्यांचे विश्‍लेषण जर अचूक झालेले असेल तर भाषण अतिशय प्रभावी ठरते. श्रोत्यांमध्ये सर्वच महिला असतील तर भाषणामध्ये समाविष्ट करण्याचे मुद्दे आणि उदाहरणे, श्रोते जर पुरुष व महिला असे दोन्ही प्रकारचे असतील, तर वेगळी असायला हवीत. तसेच, श्रोते जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील असतील तर त्यांना त्यांच्या क्षेत्रासंबंधात दिलेली उदाहरणे जास्त परिणामकारक वाटतात. उदा. वकील, डॉक्‍टर, अभियंता वगैरे.

याचाच अर्थ श्रोते जर संबंधित विषयातील तज्ज्ञ असतील तर वक्ता भाषणाची सुरवातच एका वेगळ्या उंचीवरून करू शकतो. याउलट श्रोते जर संबंधित विषयाबाबत पूर्णपणे अज्ञानी असतील तर वक्‍त्याला अगदी बारीक-सारीक सांकेतिक शब्दसुद्धा फोड करून आणि निरनिराळी उदाहरणे देऊन समजवावी लागतील. तसेच, श्रोत्यांचा वक्‍त्याबाबत असलेला दृष्टिकोन सकारात्मक आणि अनुकूल असावा. श्रोत्यांचा वक्‍त्याबाबतचा दृष्टिकोन जर नकारात्मक किंवा प्रतिकूल असेल, तर प्रथमतः वक्‍त्याला तो दृष्टिकोन सकारात्मक किंवा अनुकूल करावा लागतो. त्यासाठी श्रोत्यांना पटतील अशी काही मोजकीच पण महत्त्वाची विधाने व उदाहरणे भाषणाच्या सुरवातीलाच वक्‍त्याला कुशलतेने पेरावी लागतात. जोपर्यंत श्रोत्यांचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत वक्‍त्याला दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करावे लागतात. यानंतरच श्रोते वक्‍त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास तत्त्वतः तयार होतात. दुर्दैवाने जर वक्ता श्रोत्यांचा दृष्टिकोन बदलण्यास असमर्थ ठरला तर वक्‍त्याला काही वेळा भाषणाच्या शेवटी प्रखर विरोध सहन करावा लागतो. नकारात्मक आणि प्रतिकूल श्रोत्यांसमोर भाषण करताना वक्‍त्याला अतोनात यातना होतात. काही वेळा दगडावर डोके आपटल्यासारखेच जाणवते. असे श्रोते त्यांचा विरोध किवा निषेध त्यांच्या देहबोलीतून आणि चेहऱ्यावरील प्रतिक्रियांतून भाषणादरम्यान सतत प्रदर्शित करीत असतात. अशा प्रखर विरोधाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून चित्त विचलीत होऊ न देता आपले ठरलेले भाषण नेटाने चालू ठेवताना वक्‍त्याच्या कुशलतेचा कस लागतो. अननुभवी वक्ता अशा श्रोत्यांसमोर जास्त काळ टिकाव धरू शकत नाही. असा अनुभव राजकीय पक्षांच्या नेत्यांना सर्रास येतो.

आपल्याला किती वेळ बोलायचे आहे, कोणाआधी किंवा कोणानंतर किंवा प्रथमतःच बोलायचे आहे, दिवसाच्या कोणत्या वेळी बोलायचे आहे, याचेही पूर्ण आकलन वक्‍त्याला असणे आवश्‍यक असते. भाषणामध्ये विशिष्ट विषयावरील सर्व मुद्दे समाविष्ट करणे आवश्‍यक असते. सर्व मुद्दे समाविष्ट करण्यासाठी जर पुरेसा कालावधी उपलब्ध असेल तर वक्ता सर्व मुद्दे सविस्तरपणे सोदाहरण सहजी स्पष्ट करू शकतो. याउलट सर्व संबंधित मुद्दे समाविष्ट करण्यासाठी जर पुरेसा कालावधी उपलब्ध नसेल तर वक्‍त्याला फक्त महत्त्वाचेच मुद्दे विचारात घ्यावे लागतात आणि उदाहरणांची समर्पकपणे काटछाट करावी लागते. आधी बोललेला वक्ता जर प्रख्यात असेल तर तो कोणत्याही विषयाला एका विशिष्ट उंचीवर सहजी नेऊन ठेवतो. साहजिकच त्यानंतर बोलणाऱ्या वक्‍त्याकडून श्रोत्यांच्या अपेक्षा उंचावतात. जर अशा प्रसंगी वक्ता श्रोत्यांच्या माफक अपेक्षा पूर्ण करू शकला नाही तर श्रोते नाराज होतात. याउलट आधी बोललेला वक्ता जर फारसा नावाजलेला नसेल किंवा नवखा असेल तर तो श्रोत्यांची नाडी अचूक ओळखण्यास असमर्थ ठरतो. तसेच, तो श्रोत्यांना पूर्णतः समाधी क शकत नाही. अशा प्रकारच्या वक्‍त्यानंतर बोलणे तुलनात्मकदृष्ट्या विचार करता सोपे असते. याबरोबरच प्रथमतः बोलणाऱ्या वक्‍त्याची जबाबदारी थोडी वेगळ्या प्रकारची असते. त्याला श्रोत्यांना विशिष्ट अथवा प्रस्तुत विषयाची नुसतीच ओळख करून द्यायची नसते, तर त्या विषयावरील जास्त ज्ञान संपादन करण्याची उत्कंठा आणि जिज्ञासा निर्माण करायची असते. अशा प्रकारे एखाद्या समारंभाची सुरवात जर चांगली झाली नाही तर पुढील वक्‍त्यांवर अनावश्‍यक ताण येतो आणि श्रोत्यांचे चित्त आकर्षित करून घेण्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न करावे लागतातएखादा समारंभ यशस्वी होण्यासाठी सर्वांत कमी प्रभाव पाडू शकणारा वक्ता सुरवा तीस बोलता करावा व सर्वांत चांगला प्रभाव पाडू शकणारा वक्ता सर्वांत शेवटी ठेवावा. असा प्रभावी वक्ता इतर सर्व वक्‍त्यांचे महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या बोलण्यात समाविष्ट करतोच, त्याबरोबरच स्वतःचे मुद्देही परिणामकारक प्रदर्शित करतो. दिवसाच्या सुरवातीलाच म्हणजे सकाळच्या सत्रात बोलायचे असले तर जास्त आक्रमकपणा किंवा आरंभशूरपणा अजिबात नसावा. भाषणाची सुरवात शांतपणे करून हळूहळू आक्रमकतेची पातळी संयमाने, तारतम्याने वाढवत नेली तर भाषण अधिक प्रभावी होऊ शकते. संध्याकाळच्या सत्रात श्रोत्यांची मानसिकता थोडीशी वेगळी असते, त्यामुळे थोडी आक्रमक सुरवातसुद्धा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यास कारणीभूत ठरू शकते.

भाषणासाठी साधारणतः किती संख्येमध्ये श्रोते उपस्थित असतील याचा अंदाज वक्‍त्याने आयोजकांकडून घ्यावा. तसेच, शक्‍य असल्यास भाषण कोणत्या सभागृहामध्ये द्यावयाचे आहे, तेथील सर्व उपकरणे सोईस्कर आहेत अथवा नाहीत, याचीही पाहणी वक्‍त्याने भाषणापूर्वीच करावी. भाषणासाठी उपलब्ध करून दिलेला कालावधी जर जास्त वाटत असेल तर शेवटची दहा ते पंधरा मिनिटे प्रश्‍नोत्तरांसाठी राखून ठेवावी. त्यामुळे श्रोत्यांना भाषणातील मुद्दे किती प्रमाणात आकलन झालेले आहेत किंवा आवडले आहेत, याचा साधारण अंदाज येतो.

सादरीकरण कसे करावे?
भाषणात समाविष्ट होणाऱ्या निरनिराळ्या मुद्‌द्‌यांचे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण शैलींनी करता येते.
1) तर्कशुद्ध सादरीकरण -
भाषणामध्ये येणारे सर्व मुद्दे तर्कशास्त्रानुसार क्रमाक्रमाने समाविष्ट करून वक्ता वेगवेगळ्या मुद्‌द्‌यांवर स्वतःची मते प्रदर्शित करतो. उदा. जेव्हा एखाद्या विशिष्ट मंडळांची पुनर्रचना होत असते, त्यावेळी कराव्या लागणाऱ्या भाषणामध्ये सर्व तर्कशुद्ध मुद्दे सुसंगतपणे मांडणे गरजेचे असते. मंडळाची पुनर्रचना करण्यासाठी निकड का भासली, जुन्या मंडळाच्या कार्यामध्ये काही त्रुटी किंवा कमतरता होत्या अथवा नव्हत्या, नवीन पुनर्रचनेचे महत्त्वाचे घटक कोणते, त्यापासून होणारे महत्त्वाचे फायदे कोणते यामुळे नातेसंबंधात झालेले बदल कोणते, या आनुषंगिक होणारा खर्च किती, वगैरे.
2) कालानुरूप सादरीकरण -
सादरीकरणाच्या या शैलीमध्ये वक्ता निरनिराळ्या मुद्‌द्‌यांची कालानुरूप विभागणी करतो. उदा. वीस वर्षांपूर्वी भारतातील प्रौढ शिक्षण कशा स्वरूपाचे होते, भारतामधील प्रौढ शिक्षणाची सद्यःस्थिती काय आहे, वीस वर्षांनंतर भारतातील प्रौढ शिक्षणाची स्थिती कशी असेल, वगैरे.
3) समस्येनुरूप सादरीकरण -
या शैलीमध्ये वक्ता वेगवेगळ्या समस्यांचे सादरीकरण प्रभावीपणे श्रोत्यांसमोर करतो. तसेच, समस्येपाठोपाठ समस्येची उकल कशी करावी, याबाबतही योग्य मार्गदर्शन करतो. अशा प्रकारच्या सादरीकरणामध्ये समस्या आणि तिची उकल हे केंद्रस्थानी असतात. तथापि, भाषणांमध्ये जेव्हा समस्येविषयी विचार मांडणे अपेक्षित नसते किंवा समस्या हा मूळ हेतू असू शकत नाही, त्यावेळी या शैलीचा उपयोग वक्‍त्याला होत नाही.
4) भौगोलिकदृष्ट्या सादरीकरण -
एखाद्या विशिष्ट विषयाचा भौगोलिक क्षेत्रानुसार जाणवणारा प्रभाव या शैलीमध्ये ठळकपणे श्रोत्यांसमोर मांडण्यात येतो. उदा. प्रौढ शिक्षणाची भारतातील निरनिराळ्या राज्यांमधील स्थिती, सिनेसंस्कृतीचे निरनिराळ्या देशांमध्ये होणारे दुष्परिणाम वगैरे. अर्थात ज्यावेळी विषयाची कक्षा व्यापक नसते त्यावेळी या शैलीचा वापर वक्‍त्याला करता येत नाही. तसेच, विषयाच्या व्याप्तीनुसार वरील सर्व शैलींचा सुरेख समन्वय साधून वक्तृत्व शैलीमध्ये वैविध्य आणता येते. त्यामुळे श्रोत्यांचा उत्साह टिकून राहतो आणि ते श्रोत्यांच्या आगामी शैलीबद्दल काही अंदाज बांधू शकत नाहीत.

सुरवात कशी करावी?
विशिष्ट वक्तृत्व शैलीबाबत निर्णय झाल्यानंतर भाषणाची सुरवात अतिशय परिणामकारक असावी लागते. प्रथमतः झालेला प्रभाव हा श्रोत्यांवर दीर्घकाल टिकतो. सुरवातीच्या काही क्षणात जर वक्ता श्रोत्यांवर प्रभाव पाडू शकला तर यशस्वी होण्याचे अर्धे-अधिक काम पूर्ण झालेले असते. रेमंड बॅक्‍स्टरसारखे काही यशस्वी वक्ते प्रसंगानुरूप भाषणाची सुरवात अतिशय नाट्यमयपणे करीत असत. काही वक्ते आयोजकांचे आभार मानून भाषणाची सुरवात करणे पसंत करतात, तर काही वक्ते भाषणाची सुरवात अत्यंत औपचारिकपणे करतात. सुरवात झाल्यानंतर भाषणामध्ये कोणकोणते मुद्दे समाविष्ट होणार आहेत, याची थोडक्‍यात श्रोत्यांना माहिती दिली असता भाषणाच्या एकंदरित व्याप्तीविषयी श्रोत्यांना कयास बांधता येतो. जसजसे एकामागून एक असे निरनिराळे मुद्दे भाषणांत येत जातात, तसतसा परामर्श घेतलेल्या मुद्‌द्‌यांचा व आगामी मुद्‌द्‌यांचा धावता आढावा घेतला असता भाषणामध्ये एकवाक्‍यता राखण्यास मदत होते.उपस्थित असलेल्या श्रोत्यांनुसार भाषणाच्या शैलीमध्ये थोडाफार बदल करावा लागतो. उदा. श्रोते जर एखाद्या विषयांतील तज्ज्ञ असतील, तर "जसे आपण जाणता...' किंवा "आपल्याला माहीत आहेच की...' अशा शब्दांची पेरणी वक्‍त्याला श्रोत्यांबरोबर ठेवण्यास मदत करते. महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांची नोंद केलेले छोटे कागद भाषणादरम्यान संदर्भासाठी वापरण्यास काहीच हरकत नसते, तथापि, असे करत असताना समर्पक नैसर्गिक देहबोलीचा माफक वापर बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते; अन्यथा बऱ्याचदा वक्‍त्याचा श्रोत्यांबरोबर असलेला नजरेचा संबंध तुटतो आणि भाषणाचे रूपांतर वाचनात होते, उत्तमरीतीने सुरू झालेले भाषण त्याच उंचीवरून शेवटपर्यंत नेण्याचे कसब वक्‍त्याला अवगत असावे लागते.

No comments:

Post a Comment